Marathi Goshti naveen Marathi Goshti
अनुकरण
भगवान बुद्ध आपल्या सर्व शिष्यांवर फार प्रेम करत असत. एकदा त्यांचा वक्कली नावाचा शिष्य आजारी पडला. काही दिवस इतर भिख्खूंनी त्याची देखभाल केली परंतु तो ठीक झाला नाही. एक दिवस वक्कली आपल्या एका भिख्खू मित्राला म्हणाला,''भगवान बुद्धांचे दर्शन करायचे आहे. त्यातून माझ्या मनाला शांतता लाभेल आणि मन सुखी होईल. तसेच शरीरालाही ठीक व्हायला वेळ लागणार नाही.'' बुद्धांपर्यंत वक्कलीच्या अवस्थेचा आणि इच्छेचा संदेश पोहोचला, तेव्हा ते ताबडतोब त्याला भेटायला आले. भगवान बुद्ध येत असताना दुरुनच वक्कलीने पाहिले आणि त्यांच्या सन्मानार्थ तो पलंगावरून उठण्याचा प्रयत्न करू लागला. बुद्धांनी त्याला उठू न देता प्रेमाने म्हटले,'' मला खाली बसण्यासाठी आसन आहे, तुम्ही उठण्याची गरज नाही.'' वक्कलीने गहिवरून म्हटले,'' मला तुमचे दर्शन करण्याची मोठी आस लागून राहिली होती. ती इच्छा आज पूर्ण झाली.'' बुद्ध म्हणाले,''वक्कली, जशी वेगवेगळ्या अशुद्धीने भरलेली तुझा देह आहे, तसाच माझाही देह अशुद्धीने भरलेलाच आहे. देहाकडे लक्ष देऊ नका, धर्माकडे लक्ष द्या. आपण समाजासाठी काय करू शकतो याचा विचार करा'' बुद्धांनी यातून व्यक्तिपूजेपेक्षा सिद्धांताला महत्व दिले आहे.
तात्पर्य-व्यक्तिपूजनात केवळ व्यक्तिचेच महत्व वाढत जाते, विचारांचे नाही. व्यक्ति कितीही मोठी असली तरी तिचे आचार, विचारसरणी यांचे अनुकरण व्हावयास हवे. व्यक्ती ही कालबद्ध असते, तिच्या मृत्युनंतरही विचार आचरणात आणणे हेच गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment